सायना नेहवाल यांचे छत्रभुज नरसी स्कूलमध्ये ‘फायरसाइड कन्व्हर्सेशन’

पुणे: छत्रभुज नरसी स्कूलच्या ‘चॅम्पियन कनेक्ट’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ज्या अंतर्गत शाळा आपल्या समुदायासाठी विविध क्षेत्रांतील यशस्वी नेते आणि परिवर्तन घडवणाऱ्या व्यक्तींना अर्थपूर्ण संवादासाठी आमंत्रित करते, अमनोरा पार्क येथील छत्रभुज नरसी स्कूलमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यासोबत प्रेरणादायी फायरसाइड कन्व्हर्सेशन आयोजित करण्यात आला.

छत्रभुज नरसी स्कूलचे अध्यक्ष श्री. सुजय जयराज यांनी या संवादाचे सूत्रसंचालन केले. या चर्चेत केवळ क्रीडा क्षेत्रातील यशावर भर न देता, सातत्यपूर्ण उत्कृष्टतेमागील विचारसरणी आणि मानसिकतेचा वेध घेण्यात आला. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोर झालेल्या या मनमोकळ्या आणि उत्स्फूर्त संवादात सायना यांनी एक तरुण बॅडमिंटन खेळाडू ते भारतातील सर्वात प्रतिष्ठित क्रीडा व्यक्तिमत्त्वांपैकी एक होण्यापर्यंतच्या आपल्या प्रवासात शिस्त, जिद्द आणि सातत्य यांची भूमिका कशी महत्त्वाची ठरली, याविषयी अनुभव कथन केले.

या संवादाला आणखी एक भावनिक आणि वैयक्तिक पैलू लाभला तो म्हणजे श्री. सुजय जयराज यांचा सायना यांच्या प्रवासाशी असलेला दीर्घकाळाचा संबंध. त्यांनी यापूर्वी सायना यांच्या जीवनावर आधारित गाजलेल्या चरित्रपटाची निर्मिती केली होती. त्यामुळे या दोघांमधील संवादातून प्रत्येक यशामागील निर्धार, अपयशातून मिळालेले धडे आणि यशाच्या शिखरावर पोहोचूनही जमिनीवर राहण्याचे महत्त्व याविषयी अनोखे अनुभव समोर आले.

या परस्परसंवादी सत्रामध्ये विद्यार्थी आणि पालकांना सायना यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे हा संवाद विचारप्रवर्तक, प्रामाणिक आणि अनेकदा हलकाफुलका ठरला. तणावाचा सामना कसा करावा, अपयशावर कशी मात करावी आणि आत्मविश्वास कसा निर्माण करावा अशा विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तर देताना सायना यांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारित व्यावहारिक धडे दिले, जे केवळ क्रीडा क्षेत्रापुरते मर्यादित नसून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरले.

या सत्रानंतर सायना यांनी संपूर्ण कॅम्पसमधील विद्यार्थ्यांशी, विशेषतः बॅडमिंटन कोर्टवर, प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानांना उत्सुकतेने सामोरे जाण्याचा, आपल्या ध्येयासाठी शिस्तबद्ध राहण्याचा आणि क्रीडा, शिक्षण किंवा जीवनात कोणतेही अर्थपूर्ण यश हे झटपट मिळत नसून सातत्यपूर्ण प्रयत्नांमधूनच घडते, याची जाणीव करून दिली.

यावेळी बोलताना छत्रभुज नरसी स्कूलचे अध्यक्ष श्री. सुजय जयराज म्हणाले: “आजच्या काळात तरुणांभोवती अनेकदा केवळ अंतिम यशाच्या कथा मांडल्या जातात. अशा वेळी या प्रकारचे संवाद वेगळा दृष्टिकोन देतात. प्रत्येक मोठे यश हे असंख्य साध्या दिवसांतील मेहनत, चिकाटी आणि सातत्यपूर्ण शिकण्याच्या प्रक्रियेवर उभे असते, याची ते आठवण करून देतात.”

“कष्टाशिवाय उत्तुंग यश मिळत नाही” 

“कष्टाशिवाय उत्तुंग यश मिळत नाही. एखादा खेळाडू जरी हुशार असला तरी त्याच्याकडे यश गाठण्याची जिद्द हवी आणि प्रामाणिक कष्ट हवेत, तरच तो मोठे यश मिळवू शकतो आणि देशाचे नाव उंचावू शकतो,” असे मत ऑलंपिक बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने व्यक्त केले. तसेच, जर पालकांना मुलांना मोठे यश मिळविताना पाहायचे असेल, तर पालकांनी मुलांना शिस्त लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तसेच मुलांना मनाने खंबीर आणि संयमी बनवणे आवश्यक आहे, असेही सायना नेहवाल म्हणाली.

Leave a Comment

और पढ़ें