गडचिरोली प्रतिनिधी :
राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना वेग आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी आणखी एक मोठा राजकीय दावा केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत्या १२ डिसेंबरपर्यंत मोठी फूट पडू शकते आणि पक्षाचे काही खासदार अजित पवार गटात जाऊ शकतात, असे अत्राम यांनी म्हटले आहे.
आत्राम यांनी याचबरोबर काँग्रेस पक्षाबाबतही सूचक वक्तव्य केले. काँग्रेसमध्येही अस्वस्थता असून भविष्यात तेथेही फुटीची शक्यता नाकारता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक नेते विकासाच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षांकडे वळण्यास इच्छुक असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांना मोठा धक्का बसू शकतो, असे मत व्यक्त केले.
मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा सर्व चर्चांना फेटाळून लावले आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष एकसंघ असून कोणताही खासदार किंवा आमदार पक्ष सोडणार नाही, असा ठाम दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, भाजप आमदार संतोष बांगर यांनीही राजकीय घडामोडींवर भाष्य करत ‘ऑपरेशन टायगर’नंतर आणखी मोठ्या राजकीय हालचाली होण्याचे संकेत दिले. त्यांनी ‘ऑपरेशन चौदा’चा उल्लेख करत पुढील काळात आणखी काही लोकप्रतिनिधी सत्ताधारी गटाच्या संपर्कात येऊ शकतात, असे सूचित केले.
यावेळी बांगर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत यांनी सातत्याने वादग्रस्त विधाने करण्याऐवजी पुन्हा खासदार पद मिळवून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.
राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आत्राम आणि बांगर यांच्या विधानांमुळे नव्या चर्चांना उधाण आले असून विरोधकांकडून मात्र हे दावे केवळ राजकीय दबावतंत्र असल्याचे सांगितले जात आहे.









